मुसळधार पाऊस - त्यामुळे आलेला पूर, किंवा पाऊस न आल्यामुळे दुष्काळ, भूकंप असल्या अबला नैसर्गिक आपत्त्या आपल्याला महाराष्ट्रात अधुनमधुन खाजवून जातात म्हणून ओळखीच्या आहेत. "टोर्नाडो (प्रचंड महाभयंकर चक्रीवादळ)" आणि अमेरिकेतले "लेवल फाईव हरिकेन (म्हणजे आपल्यासोबत भेटीला दीडशे मैलांच्या अंदाधुंद वेगाने वाहणारी वादळे, धूमाधार पाऊस, सेक्युरिटी गार्ड सारखे नेहेमीच सोबतीला ठेवलेले अनेक टोर्नाडो आणि जातानाची आठवण म्हणून अब्जावधी किमतीच्या नुकसानास कारणीभूत असणारे महापूर असल्या गोष्टी घेऊन येणारे महाप्रचंड झंझावात)" ह्या अमेरिकेसारख्या बलाढ्य (म्हणजे "बला" आणि "आढ्यता" ज्याच्यामध्ये कुटूनकुटून भरली आहे असा जो तो) देशाला लोटांगण घालायला लावणार्या गोष्टी आम्हा मराठीभूमीतील बांधवांच्या एवढ्या जंगी परिचयाच्या नाहीत. तसा परिचय वाढविण्याचे कारणही उद्भवत नाही ही एक चांगली गोष्ट आहे. म्हणूनच मराठी माणसाकडे एक चिंतेचं कारण कमी असतं. भूकंप ह्या प्रकाराला मराठी माणूस घाबरत नाही. संपूर्ण जग भूकंपाच्या भितीने आपल्या इमारती भूकंपापासून सुरक्षित करण्याच्या मागे पडले असते